टीप: सर्व कथांसाठी फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत. त्यासाठी इंटरनेटचे आभार.

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
————————————–
एक जंगल. जंगलात वाघ. निवांत क्षणी वाघ आपल्या पिल्लांना घेऊन फिरत असतो. पिल्लांना जंगलाची सफारी करत असतो. शिकारीचा मूड अजिबात नसतो.
बाजूलाच एक कुत्र्यांची टोळी असते जे लांबूनच वाघाला काहीतरी टोचून बोलत असतात , काहीतरी बोलून खिल्ली उडवत असतात. मग एका पिल्लाला राग येतो तो म्हणतो …
“पप्पा … काय तुम्ही राव. बघा ना ती कुत्री कायपण बोलायल्यात”.
वाघ म्हणतो चल रे बाळा !!!
अस खूप वेळा होतं.
शेवटी घरी पोचल्यावर पिल्लू विचारत, का हो पप्पा तुमच्या एका डरकाळीवर ते कुत्र हागल असत पण तुम्ही त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही. का?
वाघ म्हणतो, वाघ आणि कुत्रा यातला फरक तुला समजावा म्हणून बाळा ![]()
सांगायचं एवढंच, जे वाघाच काही वाकडं करू शकत नाहीत त्याला कुत्रं असे म्हणतात
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल, त्यामध्ये वाघांची टोळी. एक दिवस शिकारीसाठी बाहेर पडते. बराच वेळ जातो परंतु एकही शिकार भेटत नाही. सगळेच अगदी वैतागलेले असतात तोपर्यंत त्यांना एक गवा दिसतो.
सगळे त्याच्यावर हल्ला करतात, गव्याची ताकत खूप असते त्यामुळे सर्वांनी मिळून त्याला धरलेले असते, त्याला खाली पाडतात सुद्धा परंतु सगळेच भुकेले असल्यामुळे त्याच्यावर हक्क कोणाचा यावर भांडत असतात. आणि या भांडणात गवा निसटतो आणि पळून जातो.
सांगायचं एवढंच “ताकत, एक दुसरोंके साथ रहनेसे बढती हे, खिलाफ होनेसे नहीं”
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल. जंगलात काही वाघ. काही केल्या त्या वाघांचे भांडण मिटत नसते. सगळे वाघ खूप भांडत असतात आणि नदीवर पाणी प्यायला एकमेकासमोर आले की भांडण होत असे आणि एखादा वाघ नक्की त्यात मरायचा.
गिधाडांच्या टोळीचा यात मोठा वाटा. ही टोळी एका वाघाकडं जाऊन दुसऱ्या बद्दल काहीतरी बोलायची आणि दुसऱ्याकडं जाऊन पाहिल्याबद्दल बोलायची. आणि सांगायची की तो वाघ या या वेळेस नदीवर पाणी प्यायला येत असतो तू ये आणि त्याला खतम कर आणि वाघ आपले एकमेकांशी भांडायचे आणि त्यात एकाचा मृत्यू व्हायचा आणि गिधाडांच्या टोळीला फुकट खायला मिळायचं.
सांगायचं एवढंच की एकमेकांशी भांडताना गिधाडांवर लक्ष ठेवा. समाजात गिधाडांची कमी नाही एवढं लक्षात ठेवा.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल. जंगलात वाघ. एक दिवस काय होतं, वाघांना नदी ओलांडायची असते. उन्हाळा असल्यामुळे पाण्याअभावी स्थलांतर करायचे असते वाटेत एक नदी लागते नदीमध्ये पाणी कमी असते आणि गाळ खूप असतो. नदी ओलांडत असताना एक वाघ जो मागे असतो तो गाळात अडकतो. काही केल्या त्याला बाहेर पडता येत नाही. पण शक्यतो जंगलात अस कोणाबरोबरल काही घडले तर त्याला बाहेर काढणे खूप अवघड असतं कारण एकाला वाचवण्याच्या नादात बाकीचे मारतात.
पण सगळे वाघ मिळून त्या अडकलेल्या वाघाला जीवाचं रान करून बाहेर काढतात आणि मग सगळे पुढच्या प्रवासाला निघतात.
सांगायचं एवढंच, परिस्थिती कोणतीही असो एक वाघ दुसऱ्या वाघाला अडचणीत सोडून पुढे जात नाही. जर जात असेल तर तो वाघाचं कातडं पांघरलेला लांडगा असतो जो फक्त स्वतःचा फायदा पाहतो.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल. जंगलात वाघ. वाघ एक दिवस शिकारीसाठी बाहेर पडतो. पुढे त्याला एक हरणांचा कळप दिसतो. वाघ झडप टाकायला तयार असतो.
पण जंगलात झाडांवर माकड असतात, ती माकडं वाघ दिसला की विचित्र आवाज करत असतात आणि जमिनीवर प्राण्यांना कळून चुकलेले असते की माकडांचा असा आवाज आला की समजायचं वाघ जवळपास आहे आणि निट्ट पळत सुटायचं. याचा सुरवातीला वाघाला खूप त्रास होतो कारण त्याची शिकार हातातून सुटत असते. पण काही दिवसानंतर वाघाला याची सवय होते आणि तो त्याची रणनीती बदलतो. त्याचं पूर्ण लक्ष तो शिकारीवर ठेवतो आणि माकडांच्या विचित्र आवाजातून ओरडण्याकडे दुर्लक्ष करतो. आणि शिकार करतो.
सांगायचं एवढंच, वाघाच्या आडवं कधी वाघ येत नाही हे लक्षात ठेवा, त्याच्या आडवं माकडंच येतात, आता वाघाने माकडांकडे किती लक्ष द्यायचे हे वाघाने ठरवावे.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल. जंगलात एक वाघ. एक दिवस वाघ शिकारीला निघतो, भुकेने व्याकुळ असतो , कोणत्याही परिस्थितीत त्याला शिकार करायचीच असते. बाजूलाच एक हरणांच कळप असतं ज्यात एक मादा हरणीनं एका पिल्लाला जन्म दिलेला असतो. या कळपावर वाघ हल्ला करतो आणि सगळी हरणं इकडं-तिकडं पळू लागतात आणि या सगळ्या भानगडीत ते नवजात पिल्लू एकटं पडत.
आणि बरोबर वाघाच्या पुढं जातं. आश्चर्य म्हणजे वाघ त्याला काहीच करत नाही. उलट वाघाचं मन काय माहित का हळवं होत आणि तो त्या पिल्लाला काहीच न करता सोडून देतो.
सांगायचं एवढंच
“दिल तो बाघ के पास भी होता हें कभी आजमाके देखो”
☺.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल, जंगलात वाघांच्या दोन टोळ्या, एका टोळीमध्ये (जी अतिशय मजबूत आणि चांगली टोळी असते) एक नुसता तारुण्यात पदार्पण केलेला वाघ असतो, खुप उत्साही, नवीन उमेद, खूप काही मोठी स्वप्नं वगैरे वगैरे …
या उत्साहामध्ये तो बाजूच्या टोळीबरोबर मैत्री करतो कारण तो ज्या टोळीमध्ये असतो तिथे काही नियम असतात जी जंगलाच्या आणि वाघांच्यासाठी उपयुक्त असतात आणि याच टोळीमधल्या काही बुजुर्ग वाघांनी त्याला खूप समजावलं पण काही ऐकलं नाही.
एक दिवस जंगलात अशा भागात आग लागते जेथे ती दुसरी टोळी राहत असते, आणि त्या टोळीमधला प्रत्येक वाघ आपापल्या पद्धतीने आपला व आपल्या जवळच्यांचा जीव वाचवतो पण हा पहिल्या टोळीतील तरुण वाघ जो आपली हक्काची नाती सोडून हव्यासापोटी त्या टोळीत गेलेला असतो तो एकटा पडतो आणि एक वेळ अशी येते की त्याला वाटत आपण मरतो की काय, तोवर त्याच्या टोळीतील वाघ येतात आणि त्याला सुरक्षित आपल्या घरी घेऊन जातात.
सांगायचं एवढंच आपली माणसं ही आपली असतात, आजूबाजूच्या लालची गोष्टींना बळी पडणे म्हणजे स्वतःचा बळी देणे.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
————————–
एक जंगल, जंगलात एक साप …. खूप विषारी आणि मोठ्ठा साप असतो, झाडांवरती पक्ष्यांची पिल्ले, अंडी, पक्षी यांना खाण्यात त्याला जाम मजा यायची. पण पक्षी बिचारे काही करू शकत नव्हते. त्यांनी आता सापाची दहशत मान्य केली होती.
एक दिवशी साप शिकार शोधण्यासाठी येतो आणि पुढे त्याच्या दंड ठोकून उभे असते ती खारुताई. कारण तिच्या घरट्यात तिचे २-३ पिल्ले असतात आणि सापाला तिच्या घरट्यापर्यंत पोहचू द्यायचे नाही असे तिने ठरवलेले असते. तिला माहित असते जर सापाने तिला ढसले की तिचा जीव जाणार. पण सोकलेल्या सापाची दहशत रोखायची या निश्चयाने ती मैदानात उतरलेली असते. कारण जर ती जिंकली तर पुढचे जीवन सगळ्यांसाठी सुखाचे असणार हे ती जाणून होती. योग्य आणि बचावात्मक पद्धतीने ती सापाला चावे घेऊन अक्षरशः घायाळ करते आणि साप दमून-थकून जातो. शेवटी साप कंटाळतो आणि निघून जातो.
सांगायचं एवढंच माज कधीही चांगला नव्हे, कोण कधी तुम्हाला माती चारेल हे या काळाला सुद्धा माहित नसते.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल, त्यामध्ये ७-८ वाघ, मिळून मिसळून समंजसपणान राहत असतात. सगळे मिळून शिकार करत असत आणि वाटून खात. त्याच जंगलात काही जंगली कुत्री असतात. दबाव वाघांचाच असतो त्यामुळे कुत्री ही कुत्र्यांसारखाच राहत असतात. वाघांची एकजूट हीच त्यांची ताकत असते.
एक दिवस काहीतरी शुल्लक कारणामुळे वाघांमध्ये मतभेद होतात आणि शक्ती दुभागली जाते. एक मोठी ताकत ४-५ छोट्या छोट्या ताकतीमध्ये विभागली जाते. एका छोट्या टोळीतील एक वाघ नदीवर पाणी पिण्यासाठी जातो याचा फायदा घेऊन कुत्र्यांची टोळी त्याच्यावर हल्ला करते. पण वाघ एकच डरकाळी फोडतो आणि ती ऐकून जंगलातले सगळे वाघ येतात आणि त्या सर्व कुत्र्यांना फाडून टाकतात.
शुल्लक कारण विसरून पुन्हा सगळे वाघ एकत्र येतात आणि जंगलावर राज्य वाघांचे राहते.
“जब बाघ भूल जाता हे की वो हम बाघ हे, तो जंगली कुत्ते अपना सर उठाणा शुरु करते हे”
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल, त्यामध्ये एक वाघीण, तिला ४ पिल्लं होतात. थोडा वेळ जातो आणि ती पिल्लांना सोडून पुढे चालायला लागते, यामागे उद्देश असा की त्या पिल्लांना तिच्या मागे मागे चालावं.
३ पिल्लं चालत चालत तिच्या मागे येतात. पण एक पिल्लू चालण्याचा खूप प्रयत्न करत असत पण त्याला जमत नसत. तिची आई त्याला आजिबात मदत करत नाही फक्त पुढे उभारून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असते.
पण खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याला जमत नाही. मग वाघीण त्या ३ पिल्लांना घेते आणि तिथून निघून जाते.
सांगायचं एवढंच नुसता वाघ म्हणून घेण आणि वाघाच्या पोटी जन्माला येऊन काय होत नसत वाघासारखं राहता आलं पाहिजे आणि चालता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे.
नुसता वाघाचा आव आणून कोण वाघ।होत नाही,
आणि नुसता लंगोट घातली की कोणी पैलवान होत नाही.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक जंगल, त्यामध्ये एक सिंह राहत असतो, एकटाच असतो, स्वभावामुळे त्याच्या सिहिनी सुद्धा सोडून जातात तरीपण काय गडी बदलत नसतो. आता एकटा पडल्यामुळे नेहमी सिहिणींवर अवलंबून राहणारा सिंह शिकारीवर उतरला. पण काय जमत नाही.
एकदिवस नदीवर पाणी पिण्यास जातो आणि त्याला नदीच्या किनाऱ्याला एका हिप्पोच पिल्लू दिसत आणि तो त्याच्यावर हल्ला करतो. पण त्या हिप्पोच्या पिल्लूची आई तिथेच असते ती सिंहावर जोरदार हल्ला करते आणि सिहांचा जबडाच फाडते.
सिहांचा जबडा असा फाटतो की शिकार सोडा नदीवर पाणीसुद्धा पिणे कठीण होऊन जाते. आणि एक दिवस तो स्वतःच्या मृत्यूची वाट पाहत बसतो आणि एक सिंह अक्षरशः कुत्र्याची मौत मरतो.
मुद्दा एवढाच, तुम्ही कोणीही असाल पण जर मर्यादा सोडून वागला तर मग अवघड आहे.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”

ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक गाव असतं, गावात एक गल्ली आणि गल्लीत एक कुत्रं. त्याची एकच सवय, रस्त्यावरून एखादी गाडी चालली की त्या गाडीच्या माग पळायचं.
एक दिवशी काय होत, ते कुत्रं एका गाडीच्या माग पळत सुटतं आणि लय लांब जात, पळून पळून दमत आणि थांबत, थांबल्यावर त्याला कळत की आपण गाडीच्या माग पळत पळत खूप लांब आलो आणि आता परत कस जायचं त्याला कळत नव्हतं. पुढे जाऊनही असच होत आणि एकवेळ अशी येते की त्या कुत्र्याला समजत नाही आपण आलोय कुठून आणि पुढे जाणार कुठं.
एक दिवस त्याला एक दुसरं कुत्रं भेटत त्याच नाव गुलब्या असत. ते त्याला म्हणत , एक सांग मित्रा तुला लोक कुत्रं म्हणून हाक मारतात आणि मला नाव घेऊन, असं का? त्या कुत्र्याजवळ काही उत्तर नसत मग गुलब्या त्याला उत्तर देतो,
“प्रगती ही गती आणि दिशा या दोन गोष्टींवर अवलंबून असते, एकात जरी गफलत झाली की मग दांनदिशी आवाज येतो बग”.
ते गुलब्या नावाचं कुत्रं बोम्बल्या फकीरच असत.
☺
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”
ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
—————————————–
एक चिमणी आकाशातून उडत असते आणि अचानक आकाशातून बर्फ पडू लागतो, बिचारी चिमणी गडबडून जाते आणि खाली जमिनीवर पडते.
भयानक थंडीत बिचारी कुडकुडू लागते , काही पर्याय नसतो तोपर्यंत बाजूनं एक म्हस जात असते ती शी करते आणि ते शेण बरोबर त्या चिमणीवर पडते.
त्या शेणामुळे चिमणीला खूप ऊब मिळते आणि ती थंडीपासून वाचते आणि तिचा जीवपण वाचतो.
तोवर तिथून एक गिधाड जात असतं, ते त्या चिमणीला बघत आणि त्या शेणातून बाहेर काढतं. चिमणीला वाटतं तिचा जीव वाचला पण त्या चिमणीला साफ करून गिधाड तिला खाऊन टाकत.
आता सांगायचं एवढंच, तुमच्यावर जो शेण फेकतो जरुरी नाही की तो तुमचा शत्रूच असावा. आणि जो तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतो जरुरी नाही की तो तुमचा मित्रच असावा.
बाकी काय मग तेच … “जय महाराष्ट्र”